Take a fresh look at your lifestyle.

जाणून घ्या पुण्यातील पाच मानाचे गणपती कोणते

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे.

0

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. टिळकांनी पुण्यातूनच या सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे.

पुण्यातील मानाचे पाच गणपती, दगडूशेठ, मंडई, बाबूगेनू असे नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखले जातात. त्यांना गणेशोत्सवात विशेष महत्व असते.

गणपतीच्या १० दिवसांच्या काळात दरवर्षी या गणपतींच्या दर्शनासाठी लोक अगदी बाहेरगावहूनही येतात. काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरुप बदलले असले तरीही पुण्यातील मानाच्या गणपतीचे महत्त्व आजही तितकेच आहे. जाणून घेऊया याच गणपतींविषयी…

मानाचा पहिला गणपती – श्री कसबा गणपती

कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायीका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो.

मानाचा दुसरा गणपती – श्री तांबडी जोगेश्वरी गणपती

श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात.

हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. मानाच्या गणपतींचे आणि पुण्यातील इतरही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही.

मानाचा तिसरा गणपती – श्री गुरुजी तालीम गणपती

लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही.

या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.

मानाचा चौथा गणपती – श्री तुळशीबाग गणपती

पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.

मानाचा पाचवा गणपती – श्री केसरी गणपती

पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला.

या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. १९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.