Take a fresh look at your lifestyle.

सगळीकडच्या टिकेमधून नवमहाराष्ट्राचा नेता घडतोय

0
  • आकाश भरत झांबरे पाटील

परदेशात शिक्षण घेऊन तो भारतात आला. व्यवसाय सांभाळत असतानाच आई-वडिलांच्या सार्वजनिक जीवनातील कामात शक्य होईल तशी मदत करू लागला. 2019 ला अचानक पक्षासाठी अवघड अशा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. तो डगमगला नाही, तो लढला. तो हरला पण खचला नाही.

आपल्या लक्ष्यापासून जराही भरकटला नाही. तो आजही त्याच उत्साहाने सर्वसामान्यांसाठी काम करतोय. तो म्हणजे ‘पार्थ अजित पवार’.

राष्ट्रवादी काँग्रेस साठी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणे तसे सोपे काम नव्हते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रचंड अवघड असणाऱ्या मतदारसंघात या नवख्या उमेदवाराने तब्बल 5 लाख मते घेतली हे साध काम नाही. निवडणुकीत झालेला पराभव मागे सारून पार्थ पवार कामाला लागल्याचे दिसून आले.

आपले वडील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्या पद्धतीने राज्यातील कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्य जनतेची कामे करतात, प्रश्न सोडवतात पण आपण केलेल्या कोणत्याही कामाची कधीही विनाकारण प्रसिद्धी करत नाही. कारण जनतेची कामे करणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्यच आहे आणि त्यासाठीच जनतेने आपल्याला येथे बसविले असल्याचे अजितदादा आपल्याला नेहमी सांगताना दिसतात.

अगदी तसेच आपल्या कामाची कुठेही प्रसिद्धी न करता गेले वर्षभर पार्थ पवार काम करीत आहेत. याच गोष्टीचा फटका ज्याप्रमाणे अजितदादांना बसला तसा तो पार्थ दादांनाही बसत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या वर्षभरात त्यांनी प्रचंड काम उभे केले. परंतु कमी बोलणे, माध्यमांपासून दूर असल्याने व पत्रकारांची तितकेशे मैत्रीपूर्ण संबंध नसल्याचा फटका वारंवार त्यांना बसत आलेला आहे. इतके उत्तम काम करूनही मोठ्या प्रमाणात टीका त्यांना सहन करावी लागत आहे.

ईद व ख्रिसमसला त्यांनी दिलेल्या शुभेच्छांवर कोणी काही बोलले नाही परंतु राम मंदिरासाठी दिलेल्या शुभेच्छांवरून मात्र टीका केली ही बाब खरंच अनाकलनीय अशीच आहे.

म्हणजे समाजात एखाद्या व्यक्तीबाबत काहीतरी प्रपोगंडा सेट करायचा आणि तिथून पुढे त्या व्यक्तीकडे किंवा त्याच्या भूमिका कडे पाहण्याचा कल बदलण्याचा प्रयत्न करायचा. मग तो सकारात्मक असो किंवा नकारात्मक. प्रचंड क्षमता असलेल्या पार्थ दादांच्या बाबतीतही तसेच होताना दिसत आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ती असल्या प्रपोगंडांना बळी पडणार नाही.

गेल्या वर्षी सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुरामुळे तेथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दादांनी त्या सर्व पूरग्रस्त भागाचा दौरा केला व आवश्यक ती मदत तेथील नागरिकांना केली. देशावर कोरोनाचे संकट आल्यानंतर त्यांनी राज्यभर आवश्यक असेल त्या ठिकाणी पुणे, मुंबई, नाशिक व राज्यातील जिथे जिथे विद्यार्थी, कामगार अडकून पडले होते. अशा ठिकाणी दररोज किमान 25 हजार लोकांची जेवणाची व्यवस्था केली. त्याचबरोबर 3 लाखांपेक्षा जास्त मास्क, सॅनिटायझर चे वाटप जागोजागी केले. त्यानंतर रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले होते. तेथेही लगेच दुसऱ्या दिवशीच 17 टन गहू व तांदूळ तसेच 10 हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या पाठवून आपल्या संवेदनशील मनाची प्रचिती दिली. हे कोणत्याही माध्यमांनी दाखविल्याचे मला ज्ञात नाही.

अगदी परवाचीच गोष्ट आहे अनंत डोईफोडे या वेल्हा तालुक्यातील विद्यार्थ्याने दहावीत 82 टक्के गुण प्राप्त केले व घरची हलाखीची परिस्थिती असल्याने पुढच्या शिक्षणाचे काय होणार? हा प्रश्न त्याच्या वडिलांना पडला होता. त्या संदर्भातली बातमी एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत दादांनी त्याला सर्व मदत करण्याचा निर्णय घेतला. व नंतर कॉलेजला जाण्यासाठी सायकल व इयत्ता 11 वि ची सर्व पुस्तके देण्यात आली. तसेच त्याचा पुढच्या शिक्षणाचा ही खर्च पार्थ दादांनी करण्याचा शब्द दिला. फक्त अनंतच नव्हे तर आणखीन 5 जणांचा खर्च दादांनी उचलला आहे. त्यावेळी अनंताच्या वडिलांच्या डोळ्यात आलेल्या आनंदाचे व कृतज्ञतेचे अश्रू खूप काही सांगून जात होते.

पार्थ दादांच्या बाबतीत मला खालील ओळी खूप समर्पक वाटतात…

मी व्यथांची वेदशाळा,मी नभीचा मेघ काळा
ऐक माझे वाळवंटा, मी उद्याचा पावसाळा..!

मला माहित नाही की राजकारणात आल्यापासून या व्यक्तीवर एवढी टीका का केली जातेय. सार्वजनिक जीवनात सर्वात शक्तिशाली व्यक्तीच सर्वात जास्त टीकेचा सामना करीत असते. आणि त्यामुळेच कदाचित असे असेल. कारण याला आपण संदर्भही अनेक देऊ शकतो.

छत्रपती संभाजी महाराजां बाबत असेच काहीसे झाले होते. युरोपमध्ये 19 व्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरलेल्या विन्स्टन चर्चिल यांच्या बाबतीत देखील असेच काहीसे झाले होते. तेही त्यांची पहिली लोकसभा निवडणूक पार्थ पवार यांच्या वयाचे असतानाच हरले होते व पुढचा इतिहास जगाला माहित आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल.

महाराष्ट्राच्या स्थापनेचा संपूर्ण काळ पाहिला तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी देखील प्रचंड टीका सहन केली व पुढे आदरणीय शरद पवार साहेबांनी देखील पुलोद व नंतर 1995 च्या दाऊद प्रकरणाच्या तथाकथित गोष्टींमुळे मोठी टीका सहन केली. नंतर 2012 पासून अजितदादांनी देखील तथाकथित सिंचन घोटाळ्या वरून टीका सहन केली.

पण जगात व महाराष्ट्रात अनेक नेते होऊन गेले, काही आहेत. पण सर्वाधिक टीका सहन करूनही वरील नेते कायम त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सर्वोच्च स्थानी राहिलेले आहेत. कारण टीका माणसाला घडवत असते, मजबूत बनवत असते. न खचता, न डगमगता काम करीत राहिले तर सगळ्यांना पुरून उरता येतं हेच या नेत्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. आणि आता पार्थ दादाही त्याच मार्गाने जात आहेत. तेही उद्या महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते झाले तर वावगे वाटायला नको.

शेवटी मी दादांना एवढेच सांगू इच्छितो की,
दादा, खचू नका.
महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी व युवक आपल्या सोबत आहे.

  • आकाश भरत झांबरे पाटील
  • लेखक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.