Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राचा एकही उपमुख्यंमत्री मुख्यमंत्री का होऊ शकला नाही ?

0

राज्यात भाजप सरकार जावून महाविकास आघाडीचे सरकार आले. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. खरंतर अजित पवार त्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या दोन दिवसाच्या सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आजवर चारवेळा शपथ घेतली आहे. पण त्यांचे समर्थक मात्र त्यांना मुख्यमंत्री पाहण्याची स्वप्ने बघत आहेत

पण राज्यातील आजवरचा राजकीय इतिहास बघितला तर आजपर्यंत एकही उपमुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचू शकला नाही. हाही योगायोग म्हणावा लागेल.

राज्याचे आजवरचे उपमुख्यमंत्री

मार्च 1978 ते जुलै 1978नासिकराव तिरपुडेइंदिरा काँग्रेस
जुलै 1978 ते फेब्रुवारी 1980सुंदरराव सोळंकेसमाजवादी काँग्रेस
फेब्रुवारी 1983 ते मार्च 1985रामराव आदिककाँग्रेस
मार्च 1995 ते ऑक्टोबर 1999गोपीनाथ मुंडेभाजप
ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर 2003छगन भुजबळराष्ट्रवादी
डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2004विजयसिंह मोहिते पाटीलराष्ट्रवादी
नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008आर आर पाटीलराष्ट्रवादी
डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010छगन भुजबळराष्ट्रवादी
नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012अजित पवारराष्ट्रवादी
ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014अजित पवारराष्ट्रवादी
23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019अजित पवारराष्ट्रवादी
सध्याअजित पवारराष्ट्रवादी

आणीबाणी, इंदिरा कॉंग्रेस आणि पहिला उपमुख्यमंत्री

राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण ? तर यशवंतराव चव्हाण पण राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण, अस विचारलं तर अनेकांना हे उत्तर सांगता येणार नाही. तर राज्याला पहिले उपमुख्यमंत्री मिळाले १९७८ साली नासिकराव तिरपुडे

नासिकराव तिरपुडे

त्यामागची गोष्ट म्हणजे देशात आणीबाणी नंतर देशात निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत देशात पहिल्यांदा कॉंग्रेसला धक्का बसला. लोकसभा निवडणुकांच्या पाठोपाठ राज्यातही निवडणुका झाल्या. आणीबाणीचा फटका राज्यातही बसणार याची जाणीव झाल्याने राज्यातल्या काही कॉंगेस नेत्यामध्ये चलबिचल होवू लागली.

त्यातच त्यावेळी राज्याच्या कॉंग्रेसमध्ये दबदबा असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी आंध्रप्रदेशातील कॉंग्रेस नेते ब्रम्हानंद रेड्डी यांच्या सोबत रेड्डी कॉंग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस पक्ष संघटना मुळचा कॉंग्रेस म्हणजे इंदिरा कॉंग्रेस आणि त्यावेळी नवीन स्थापन झालेला रेड्डी कॉंग्रेस अशा दोन गटात विभागली गेली.

विधानसभा निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेस वेगवेगळ्या लढल्या. निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. आणीबाणीनंतर देशभर विरोधी पक्षांनी एकत्रित स्थापन केलेल्या जनता पक्षाला ९९ जागा मिळाल्या. तर इंदिरा कॉंग्रेस ६२ आणि रेड्डी कॉंग्रेसला ६९ जागा मिळाल्या.

कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्या. रेड्डी कॉंग्रेसचे वसंतदादा मुख्यमंत्री झाले आणि इंदिरा कॉंग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले आणि अश्या प्रकारे ७ मार्च १९७८ च्या दिवशी राज्याला पहिला उपमुख्यमंत्री मिळाला.

उपमुख्यमंत्री पद म्हणजे राजकीय सोय !

खरतरं आजपर्यंत उपमुख्यमंत्री पदाला घटनात्मक दर्जा काय ? असा कायम प्रश्न विचारला जातो. यावरून कोर्टात वाद गेल्याचीही काही उदाहरणे आहेत. पण उपमुख्यमंत्री पद म्हणजे युती-आघाडीच्या राजकारणात सत्ता समोतलासाठी वापरले जाणारे पद आहे. १९७८ जेव्हा पहिल्यादा हे पद राज्यात निर्माण झालं तेव्हा दोन्ही काँग्रेसना एकत्रित सत्ता राबवायची होती.

त्यानंतरही १९९५ साली राज्यात पहिल्यांदा युतीचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्री सेनेचा तर उपमुख्यमंत्री भाजपचा असा सत्ता समतोल साधला गेला. राज्यात १५ वर्ष चाललेल्या कॉंगेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारमध्ये देखील हाच फॉर्म्युला वापरला गेला.

पण २०१४ साली सेना भाजप एकत्रित सत्तेत असली तरी देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात सेनेची मागणी असतानाही त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले नाही. २०१९ साली मात्र मोठी राजकीय उलाढाल झाल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला वापरला गेला. हि देखील राजकीय सोयच आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होवू शकतात ?

राज्याला आजवर ८ उपमुख्यमंत्री मिळाले. त्यातही तो काही काळासाठीचा राजकीय समझोता होता. नासिकराव तिरपुडे यांच्यापासून अजित पवार यांच्या पर्यंतच्या नावाचा विचार करता. गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार हे मुख्यमंत्री होवू शकले असते. आज गोपीनाथ मुंडे हयात नाहीत. अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री बनतील का ? हे काळच सांगेल.

राज्यात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे राहिले आहे. त्यातही १९९९ साली स्थापन झालेल्या राष्ट्रवादीकडे स्थापनेपासून आजपर्यंत उपमुख्यमंत्री पद राहिले आहे (२०१४ ते २०१९ सालचा अपवाद, पण या काळात राज्यात उपमुख्यमंत्री नव्हते)

काही राजकीय विश्लेषकांच्या मते राष्ट्रवादीला आपला मुख्यमंत्री करता आला असता पण मुख्यमंत्री पदापेक्षा बाकीची लाभाची खाती पदरात पाडून घेण्याकडे राष्ट्रवादीचा भर राहिला आहे. राष्ट्रवादीकडून आजवर छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर. पाटील आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदावर काम केले आहे.

आजवरचा एकंदरीत इतिहास बघता मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांचा सातत्यानं वाद होत आला आहे. तशी त्या वादाची कारणेही अनेक होती. त्यातही दोन वेगवेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री असल्यावर पक्षीय भूमिकेतूनही अनेक वाद निर्माण होत राहिले. त्या यादीत नासिकराव तिरपुडे असो, गोपीनाथ मुंडे असो अथवा अजित पवार असो! 

परंतु महाराष्ट्राच्या सत्तेचा आजवरचा इतिहास असा राहिला आहे कि जो नेता उपमुख्यमंत्री बनला तो कधीच मुख्यमंत्रिपदी विराजमान झाला नाही

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.