Take a fresh look at your lifestyle.

भारत राहिला तर महाराष्ट्र राहील, भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल

0

संयुक्त महाराष्ट्रासाठी एक जनआंदोलन उभे राहिल्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटन समारंभात राजभवन, मुंबई येथे यशवंतराव चव्हाण यांनी व्यक्त केलेले मनोगत

आजच्या ह्या ऐतिहासिक क्षणीं पंडित जवाहरलालजींचे आभार मानण्यासाठीं मी उभा राहिलों आहें. अनंत काळपर्यंत चालणा-या महाराष्ट्र राज्याला पहिला आशीर्वाद देण्याकरतां भारताचा आजचा युगपुरुष येथें आला आणि त्यानें आम्हांला आशीर्वाद दिले. महाराष्ट्राच्या लाख लाख जनतेतर्फे मी जवाहरलालजींचे लाख लाख आभार मानतों. महाराष्ट्रांतील आम्हां माणसांचें त्यांच्यावर प्रेम आहे. त्यांच्यावर भक्ति आहे. आणि आम्ही आज त्यांना परत आश्वासन देऊं इच्छितों कीं, महाराष्ट्राचें हें जें राज्य निर्माण झालें आहे तें मराठी जनतेच्या कल्याणाचें काम तर करीलच, परंतु मराठी भाषिकांच्या जवळ जें देण्यासारखें आहे, त्यांच्या जीवनामध्यें जें चांगलें आहे, जें उदात्त आहे, त्याचा त्याग जर करावयाचा असेल तर तो आम्ही भारतासाठीं प्रथम करूं. कारण आमचा हा पहिल्यापासून विश्वास आहे कीं, भारत राहिला तर महाराष्ट्र राहील, भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल. भारताचें आणि महाराष्ट्राचें हित जेव्हां एकरूप होतें तेव्हां भारतहि मोठा होतो आणि महाराष्ट्र हि मोठा होतो, हा इतिहास महाराष्ट्राच्या रक्तारक्तांतून भिनलेला आहे. आणि म्हणून मी गेल्या चार आठ दिवसांमध्ये प्रतीकाच्या रूपानें सांगत आलों आहें कीं, भारताचें प्रतीक हिमालय आहे तर महाराष्ट्राचें प्रतीक सह्याद्रि आहे. उंचउंच शिखरें असलेला बर्फाच्छादित हिमालय हें भारताचें प्रतीक आहे, तर दोनशें – दोनशें, तीनशें – तीनशें इंच पावसाचा मारा आपल्या डोक्यावर घेणारा काळ्या फत्तराचा सह्याद्रि आमचें प्रतीक आहे. आणि जर कधीं भारताच्या हिमालयावर संकट आलेंच तर आपल्या काळ्या फत्तराची छाती हिमालयाच्या रक्षणाकरतां महाराष्ट्राचा सह्याद्रि उभी करील असें मी आपणांला आश्वासन देऊ इच्छितो.

परिश्रम हा आजच्या काळाचा युगधर्म आहे आणि पंडितजी, आपण आग्रहपूर्वक आम्हांला परिश्रमाच्या घामानें महाराष्ट्र आणि राष्ट्र रचण्याचा आज संदेश दिला आहे. हा मोलाचा संदेश आम्ही आमच्या अंतःकरणावर कोरून ठेवूं आणि यापुढें प्रत्येक क्षणीं तुम्हीं दिलेले आशीर्वाद आणि तुम्हीं केलेलें मार्गदर्शन हे युगपुरुषाचे आशीर्वाद आणि युगपुरुषाचें मार्गदर्शन आहे ह्या दृष्टीनें त्यांच्याकडे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करूं.

आणि आतां आमच्या जुन्या परंपरांना अनुलक्षूनच दुरिताचें तिमिर जावो हें वरदान मी मागत आहें. ही आमची प्रार्थना ज्ञानेश्वरांनी आम्हांला शिकविलेली आहे. जें अमंगल असेल त्याचा अंधःकार दुनियेवरून नाहींसा होवो व सत्याचा विजय होवो, हें तत्त्वज्ञान आणि हे आशीर्वाद आम्हांला आमच्या संतांकडून मिळाले आहेत. समानतेचें तत्त्व त्यांनीं आम्हांला शिकविलें आहे आणि अन्यायाचा प्रतिकार करावयालाहि त्यांनीं आम्हांला शिकवलें आहे. देशावर प्रेम करावें आणि स्वराज्य आपला मंत्र मानावा, हा संदेश आम्हांला आमच्या नेत्यांनीं दिलेला आहे. आणि या संदेशाच्या पार्श्वभूमीवर, महात्मा गांधींचे कर्तृत्व आणि महात्मा गांधींचें व्यक्तिमत्त्व यांतून आपणां सर्वांना मिळालेला दिव्य संदेश महाराष्ट्र कधींहि विसरणार नाहीं याची ग्वाही या परममंगल प्रसंगीं मी आपणांस देऊं इच्छितों.

महाराष्ट्र राज्यातर्फे, मराठी जनतेतर्फे आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे मी राज्यपालजींचे आणि पंडितजींचे आभार मानतो. आणि हा नवोदित महाराष्ट्र असाच वाढत राहो, त्याचें तेज सतत वाढतें राहो आणि हें तेज भारताच्या आणि मानवाच्या कल्याणासाठीं खर्ची पडो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतों.

सदर भाषण “सह्याद्रीचे वारे” या पुस्तकामध्ये प्रकाशित आहे

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.