Take a fresh look at your lifestyle.

उत्तर प्रदेशात जन्मलेले नवाब मलिक महाराष्ट्रात आमदार कसे झाले ?

सध्या राज्याच्या राजकारणात नवाब मलिक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

0

सध्या राज्याच्या राजकारणात नवाब मलिक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नवाब मलिक हे राज्य सरकारमध्ये अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला वानखेडेंनी तुरुंगात पाठवले होते. तेव्हापासून ते नवाब मलिकांच्या निशाण्यावर आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक दररोज हल्ला करत आहेत. त्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आज आम्ही तुम्हाला नवाब मलिक यांची संपूर्ण पार्श्वभूमी सांगणार आहोत.

परिवारात कोण कोण ?

नवाब मलिकांचा पत्नी मेहजबीन, मुलगा मेराज, अमीर आणि मुली निलोफर आणि सना असा परिवार आहे. नवाब मलिक यांच्या जावयाचे नाव समीर खान आहे.

गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या हत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला ड्रग्जच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगावा लागला तेव्हा समीर खानचे नावही पुढे आले. एका ड्रग पेडलरने त्याचे नाव घेतले होते, तेव्हा एनसीबीने त्यांच्या जावयाला अटक केली होती.

जन्म आणि शिक्षण

नवाब मलिक यांचा जन्म 20 जून 1959 रोजी उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील उत्रौला तहसील भागातील धुसवा येथे झाला. प्राथमिक शिक्षणासाठी नवाब यांना सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र वडील मोहम्मद इस्लाम यांच्या नातेवाईक आणि मित्रांच्या विरोधामुळे ते इंग्रजी शाळेत गेले नाहीत. नंतर नवाब मलिकांना महापालिकेच्या नूरबाग उर्दू शाळेत दाखल करण्यात आले.

येथून त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर, डोंगरी येथील जीआर क्रमांक 2 शाळेत सातवीपर्यंत आणि त्यांनी अंजुमन हायस्कूलमधून 10 वी आणि त्यानंतर 1978 मध्ये बुरहानी कॉलेजमधून 12 वीचे शिक्षण घेतले. त्याच कॉलेजमध्ये बीएला प्रवेशही घेतला. मात्र कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी बीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली नाही.1979 मध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला, परंतु शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत.

नवाब मलिक यांचा भंगारचा व्यवसाय होता का ?

भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मलिक एकदा म्हणाले होते की, “होय, मी भंगार विक्रेता आहे. माझे वडील मुंबईत कपडे आणि भंगाराचा व्यवसाय करायचे. मी आमदार होईपर्यंत भंगाराचा व्यवसायही केला. माझ्या कुटुंबाला आजही त्याचा अभिमान आहे.”

1970 मध्ये ते कुटुंबासह मुंबईत शिफ्ट झाले. मलिक कुटुंबाचे मुंबईत छोटे-मोठे व्यवसाय होते. त्यांचे एक छोटे हॉटेलही होते. याशिवाय त्यांचा रद्दी, भंगाराचा व्यवसायासोबत आणखी काही छोटे व्यवसाय होते.

राजकारणात एन्ट्री

नवाब मलिक यांनी 1996 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील नेहरू नगरमधून निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. त्यानंतर 1999 आणि 2004 मध्येही ते येथून विजयी झाले. 2009 मध्ये, मलिक यांनी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि सलग चौथ्यांदा आमदार झाले.

2014 मध्ये त्यांनी त्याच विधानसभेतून पुन्हा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मलिक पुन्हा येथून लढले आणि पाचव्यांदा आमदार झाले.

नवाब मलिक हे सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. माध्यमांतून ते पक्षाची बाजू अतिशय समर्थपणे मांडत असतात. उत्तर भारतीय असूनही मराठी भाषेवर त्यांची चांगली पकड आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीनंतर नवाब मलिक यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. 2020 मध्ये मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षही करण्यात आले. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात.

पुलवामा हल्ल्यावर दिले होते वादग्रस्त विधान

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्यांबाबत 2020 मध्ये नवाब मलिक यांनी वादग्रस्त विधान केले होते. पुलवामा हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त मलिक म्हणाले होते, ‘एका वर्षात हे कळले नाही की आरडीएक्स आले कुठून? 40 जवान शहीद झाले, निवडणूकीचा हा मुद्दा बनला आणि मोदीजींनी निवडणूक जिंकली.’

नवाब मलिकांना असे म्हणायचे होते की, पुलवामा हल्ला हा भाजपच्या कटाचा भाग होता. या विधानावर बराच गदारोळ झाला होता. आता सध्याही नवाब मलिक त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.